यावेळी जिकडे विकास तिकडे जनता…

अमळनेर : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी या मतदार संघात उमेदवारी करण्यासाठी डझन भर इच्छूक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तालुक्यात मिरवतानां बघायला मिळत आहेत.
अमळनेर ही संतांची व क्रांतिकारकांची भूमी आहे. याच भूमीतून साने गुरुजींनी पंढरपूरच्या मंदिरात अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले होते तर डांगरीचे उच्च विभूषित क्रांतिवीर उत्तमराव पाटील व क्रांतिवीरंगना लीलाताई पाटील यांनी स्वतःचे लग्न सत्यशोधक पद्धतीने करून लग्नातील जेवणाच्या प्रथम पंगतीत अस्पृष्य समाजाला बसवून सामाजिक सलोखा निर्माण केला.
याउलट आज तालुक्यातील सामाजिक सलोखा अडचणीत आणून निवडणुका लढवण्याचा चंग उतावीळ उमेदवार यांनी बांधला असल्याचे दिसून येत आहे. मागील विधानसभा निवडणुक जातीयतेच्या आधारावर लढली गेली. एका उमेदवाराने अल्पसंख्याक फॅक्ट आणला. तर काही प्रमाणात का असेना एकी कडे मराठा स्वाभिमान जागे झाल्याचे चित्र दिसले होते. त्यादरम्यान सामाजिक वातावरण ढवळून निघाले. खालच्या स्तराला जाऊन राजकारण केले गेले.याचा नागरिकांच्या जीवन मनावर विपरीत परिणाम झाला होता.
नेते जातीला अथवा त्यांच्या समुहाला गृहीत धरतात…..
अमळनेरची सामाजिक शांती भंग करण्यात राजकीय नेते कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. काही नेते बहुजनांचा / अल्पसंख्याकाचा मुखवटा लावून बहुजन समाजाला गृहीत धरून आपले हक्काचे असल्यासारखे वागत आहेत. बहुजन समाज (अल्पसंख्याक) आपल्यालाच मत देतील असे मनात लाडू फोडत आहेत. मात्र आज हा समाज जागृत झाला असून तो कोणाच्याही दावणीला बांधला जाणार नाही. अश्या नेत्यांना समाजातील सुज्ञ मतदार त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवल्या शिवाय राहणार नाहीत, अशी चर्चा बहुजन (अल्पसंख्याक) समाजातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.

बहुजन नेत्यांची भूमिका….
तालुक्यातील जातीयतेचे वातावरण पराकोटीला गेले असताना बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे मात्र कोणत्या तरी नेता अथवा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे समाजावर होणारे अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहेत. समाजात अश्या पुढाऱ्यांच्या विरोधात जनमत होताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत या समाजाच्या पुढाऱ्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नसल्याचे बोलले जाते.
